Tuesday, January 25, 2011

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

हे कंकण करि बान्धियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले
मी सिध्द मरायाला हो।
बलसागर भारत होवो ।।1।।

वैभवी देश चढवीन
सर्वस्वी त्यास अर्पिन
तिमिर घोर संहारीन
या बन्धु सहाय्याला हो।
बल सागर भारत होवो ।।2।।

हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।
बलसागर भारत होवो ।।3।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।
बलसागर भारत होवो ।।4।।

या उठा करू हो सार्थ
सम्पादु दिव्य पुरूषार्थ
जीवन हे ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।
बलसागर भारत होवो ।।5।।

मी माय थोर होईल
वैभव दिव्य शोभेल
जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।
बलसागर भारत होवो ।।6।।
- साने गुरूजी

आता उठवू सारे रान.........साने गुरुजी

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

Saturday, January 22, 2011

केशवसुत .....कृष्णाजी केशव दामले

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांचा दि. ७ ऑक्टोबर १८६६ रोजी मालगुंड, जि.रत्नागिरी येथे जन्म झाला.

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.

इंग्रजीतील कवितांतून दिसणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन केशवसुतांनी प्रथम मराठीत आणला. कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी, कोणत्याही प्रभावाशिवाय असे ते म्हणत. तिने याच प्रकारचे काव्य रचावे, असेच रचावे असे तिला आपण आदेश देऊ नयेत असे त्यांचे म्हणणे होते. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला.

त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.



मालगुंड येथील केशवसुत स्मारक

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून

प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

मराठी कवितेच्या क्षेत्रात क्रांती घडवणार्‍या, कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

Thursday, January 20, 2011

कुसुमाग्रज....विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९)

विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककारसमीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.
ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.
यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
१९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली.

कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस!

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या चिंताजनक स्थितीविषयी आणि शासनाच्या अनास्थेविषयी भाष्य केले होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी मराठी भाषेविषयीचे विचार व्यक्त केले होते.
‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे; गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ या त्यांच्या काव्यपंक्तींतून त्यांचे मराठी-प्रेम दिसून येते.
कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.


Tuesday, January 18, 2011

मंथर नाग


ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

- कुसुमाग्रज

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

- कुसुमाग्रज

गवाताच पातं

गवाताच पातं वार्‍यावर डोलतं
डोलतान म्हणतं खेळायला चला ||ध्रु||

झर्‍यातलं पाणी खळ खळा हसतं
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला ||१||

झिम्मड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो
धावताना म्हणतो शिवायाला चला ||२||

मनिच पिल्लू पायाशी लोळतं
लोळतान म्हणतं जेवायला चला
अहो,जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||३||


- कुसुमाग्रज

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत

बाभळी


लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे

- कवयित्री इंदिरा संत

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.

शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणि कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
किती फीरावे... उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण ...

निवडुंगाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची ...

- इंदिरा संत

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

- ग. ह. पाटील

फुलपांखरूं

फुलपांखरूं !

छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह. पाटील

लेझिम चाले जोरात

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,

शेतकरी मन प्रसन्न जाहले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...
ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले...,
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,
छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्रीधर बाळकृष्ण रानडे

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी

खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात ध्रुर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !

- माधव ज्यूलीअन

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा, टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे, तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्या धनप्रतिष्ठा, लाभे अता मला ही,
आईविणे परी मी, हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा, की तिर्थरुप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


- माधव ज्यूलीअन

मृग


माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनीया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

-ग. दि. माडगुळकर

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !
गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


- ग.दि. माडगूळकर

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

- ग.दि. माडगुळकर

जिंकू किंवा मरू

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुऊसंगे, युद्ध आमुचे सरू

जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक, लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू


गीत - ग. दि. माडगूळकर

पोटापुरता पैसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी

देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥

हवाच तितुका पाडी पाउस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥

सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥

- ग. दि. माडगूळकर

दीवटी - वि. म. कुलकर्णी

आधी होते मी दीवटी

शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मीणमीणती!!

समई केले मला कुणी
देवापुढती नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत कालासा धूर!!

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच त्यातील प्री ज्योती !!

ब्त्तीचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बर्वे
वरात मज वाचून अडे
झ्ग्झ्गाट तो कसा पडे!!

आता झाले मी बीज्ली
घरे मंदीरे ल्ख्ल्ख्ली
देवा ठाउक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे .

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जलो अन् जग उजलो!!

-वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,


रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !

कवी - वि.म. कुलकर्णी

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी

मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

- वि. म. कुलकर्णी

अमर हुतात्मे झाले!

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !

- वि. म. कुलकर्णी

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले
दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

- बा.भ. बोरकर

चढवू गगनी निशाण

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण

कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण

- बा.भ. बोरकर

विचित्र वीणा

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते

थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

- बा. भ. बोरकर

माझा गाव - बा. भ. बोरकर

निळ्या खाडीच्या काठाला

माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !

पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.

माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.

असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.

थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.

जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.

गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.

- बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत - बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||

- बा. भ. बोरकर

तेथे कर माझे जुळती - बा. भ. बोरकर

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥
जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)

लाला टांगेवाला

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला

ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

- नारायण गोविंद शुक्ल

ऋणाईत


स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...

कवी - केशव तानाजी मेश्राम

संदिग्ध ढगांच्या ओळी - ग्रेस

पाऊस कधीचा पडतो,

झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी,
पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा,
या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

-- माणिक सी. गोडघाटे उर्फ कवी ग्रेस

भय इथले संपत नाही.....ग्रेस

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो... तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

- कवी ग्रेस

बहु असोत सुंदर .....श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर संपन्न की महा

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

आई - फ. मु. शिंदे

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मु. शिंदे

डरांव डरांव बालगीत)

आभाळ वाजलं धडामधूम

वारा सुटला सूं सूं सूं
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभर जाऊन बुडली, बुडली.
बोटीवर बसले बेडूकराव
बेडूक म्हणाला डरांव डरांव.

इंजिनदादा (बालगीत)

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या

- (अज्ञात)

संथ निळे हे पाणी .....मंगेश पाडगावकर

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदणे ओले
थिबके पाण्यावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मनाचा गाभारा

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ..... मंगेश पाडगावकर

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ........मंगेश पाडगावकर

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

खबरदार जर टाच मारुनी ...... वा.भा. पाठक

सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अती भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमावीण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"

- वा.भा. पाठक

मी फुल तृणातील इवले ......... मंगेश पाडगावकर

जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:ला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणाच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

- मंगेश पाडगावकर

Wednesday, January 12, 2011

हीच दैना ..... विंदा करंदीकर

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.

-”मृदगंध” विंदा करंदीकर

रचना ..... विंदा करंदीकर

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

लागेल जन्मावें पुन्हां .....विंदा करंदीकर

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी.

तूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तूं बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढें,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी.

होशी फुलासह फूल तूं अन् चांदण्यासह चांदणे,
- तें पाहणें, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं.

म्हणतेस तूं, ” मज आवडे रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवूं कसा या हुन्नरी शब्दावरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.

- विंदा करंदीकर

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही .....विंदा करंदीकर

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही

गायक :श्रीधर फडके
संगीतकार :यशवंत देव

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी ..... विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी

गीत – विं. दा. करंदीकर
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी.....विंदा करंदीकर

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी

भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी

गीत – विं. दा. करंदीकर
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

जडाच्या जांभया ..... विंदा करंदीकर

रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही.

संस्कृतीला साज नाही.
मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा,
जीवनाची खाज नाही.

इथें आतां युद्ध नाही;
इथें आतां बुद्ध नाही;
दु:ख देण्या, दु:ख घेण्या
इथे आतं शुद्ध नाही.

भावनेला गंध नाही;
वेदनेला छंद नाही;
जीवानाची गद्य गाथा
वाहतें ही; बंध नाहीं!

चोर नाही; साव नाही;
मानवाला नांव नाही;
कोळ्शाच भाव तेजीं
कस्तुरीला भाव नाही.

जागतें कैवल्या नाही;
संशयाचे शल्य नाही;
पापपुण्या छेद गेला.
मुक्ततेला मूल्य नाही.

जन्मलेल्या बाप नाही;
संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला
अमृताचा शाप नाही.

—-जाणीवेची याच साधी
राहिली मागें उपाधीं;
– या जडाच्या जांभया हो
ना तरी आहे समाधी!

- “मृदगंध” विंदा करंदीकर