Tuesday, June 20, 2017

समर्थ रामदासांचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र



अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥

कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥

पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥

जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥

श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥

ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥

आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥

राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥

आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥

समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥

राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥

आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥

लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥

शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥

शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥

सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

No comments:

Post a Comment