Friday, September 2, 2011

इतकी नाजुक इतकी अल्लड

इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक...........३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7 

Wednesday, June 1, 2011

गोविंदाग्रज.....राम गणेश गडकरी


राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (२६ मे, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - २३ जानेवारी, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

नाटककार राम गणेश गडकरी, कवी गोविंदाग्रज आणि विनोदी लेखक बाळकराम या तीन रूपांनी रसिकजनांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे राम गणेश यांची 23 जानेवारी 2011 ही 92 वी पुण्यतिथी. तेहतीस वर्षे आणि काही महिने (जन्म २६ मे १८८५, मृत्यू २३ जाने १९१९) इतकेच अल्पायुष्य गडकऱ्यांना लाभले. पण त्यांनी वाङ्मयीन क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली!
‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।
असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार राम गणेश गडकरी! ‘आम्ही गेलो त्यावेळी स्टेजवर मुख्य पुरुषपार्टी, मुख्य स्त्री पार्टी व एक भटाचे सोंग घेतलेला मनुष्य यांची कामे चालली होती. फक्त मुख्य पार्टी नटांनीच रंग लावला होता. तो सगळ्या अंगभर होता. रंग फारच वाईट. अगदी हळदीसारखा होता. भटाने रंग लावला नव्हता. पण त्याचे सोंग हुबेहूब झाले होते. त्याची नक्कल अगदी चोख होती, पण तो फार घाईने बोलत होता. म्हणून त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते -नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी राहणाऱ्या छोटय़ा ‘जगू’ने प्रत्यक्ष लग्नसमारंभाला हजर राहून लिहिलेला रिपोर्ट- बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
गडकऱ्यांच्या वाटय़ाला सुखासमाधानाचे दिवस फारच थोडे आले. उपेक्षा आणि अपमानाचे चटके सहन करीतच त्यांना जगावे लागले. ‘एकच प्याला’ (पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ ला गंधर्व नाटक मंडळीने बडोदा येथे व बलवंत संगीत मंडळीचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी १९२० ला सोलापूर येथे), ‘भावबंधन’ (१८ ऑक्टोबर १९१९ ला बलवंत संगीत मंडळीतर्फे अकोला येथे), ‘वाग्वैजयंती’ (काव्यसंग्रह १९२१ मध्ये प्रसिद्ध झाला) या गडकऱ्यांच्या कलाकृती त्यांच्या निधनानंतर (मृत्यू-२३ जानेवारी १९१९) रसिकांच्या समोर आल्या आणि त्यानंतरच गडकरी रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले. ‘जिवंत असता लत्ता देती। मेल्यावर खांद्यावर घेती।। हे बोल गडकऱ्यांच्या बाबतीत एकशे एक टक्के खरे आहेत. चार पूर्ण (वेडय़ांचा बाजार, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन) आणि दोन अपूर्ण (राजसंन्यास, एकच प्याला- यातील पदे गडकऱ्यांचे स्नेही विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी गडकरी निधन पावल्यानंतर लिहिली आहेत.), पावणेदोनशेच्या आसपास कविता (त्यातील अनेक कविता अपूर्ण स्वरुपात) आणि रंगभूमी मासिकातले काही लेख इतकीच गडकऱ्यांची साहित्यसंपदा! पण या त्यांच्या अल्प पण उत्कृष्ट साहित्याने खरोखर काळावरही मात केलेली आहे. ‘भावबंधन’ या नाटकातला अखेरचा प्रवेश त्यांनी पांडोबा नावाच्या लेखनिकाला लिहून घ्यायला सांगितला आणि त्यानंतर मध्यरात्री गडकऱ्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
नाटकाचा नाद, गैरशिस्त अभ्यास व अस्थिर मन:स्थिती यामुळे गडकऱ्यांना परीक्षेत अपयश आले आणि त्याच वर्षी (मे १९०६) त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून, बार्शी मुक्कामी किलरेस्कर नाटक मंडळीत ‘मास्तर’ म्हणून नोकरी स्वीकारली. कंपनीतल्या मुलांना शिकवण्यापासून ते डोअरकीपपर्यंत सर्व कामे त्यांनी केली. नटवर्य गणपतराव बोडसांनी त्यांच्या नाटय़लेखनाला चालना दिली. गडकऱ्यांनी ज्यांना मनाने आधीच गुरुपदी मानले होते त्या तात्यासाहेब कोल्हटकरांची (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) प्रत्यक्ष भेट झाली. गडकऱ्यांची प्रतिभा दिसामासांनी फुलू लागली. ‘वेडय़ांचा बाजार’ हे नाटक आणि ‘रंगभूमी’ मासिकात ‘सवाई नाटकी’ या नावाने नाटय़विषयक लेख प्रसिद्ध होऊ लागले. ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘अल्लड प्रेमास’ ही कविता प्रसिद्ध झाली. ‘प्रेमसंन्यास’ या त्यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्र नाटक मंडळाने मुंबई मुक्कामी सादर केला (१७ फेबुवारी १९१२) आणि त्यानंर १ जुलै १९१६ रोजी किलरेस्कर नाटक मंडळीने त्यांचे ‘पुण्यप्रभाव’ नाटक मुंबई मुक्कामी रंगभूमीवर आणले.
‘राम गणेश गडकरी’ ‘गोविंदाग्रज’ आणि ‘बाळकराम’ या नावांभोवती आता वलय निर्माण होऊ लागले. गंधर्व मंडळीसाठी त्यांनी ‘एकच प्याला’ लिहिले, बलवंत संगीत मंडळीसाठी ‘भावबंधन’च्या लेखनास प्रारंभ केला. ‘राजसंन्यास’ चा आराखडा कागदावर मांडला, लेखनाला सुरुवात केली आणि गडकऱ्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली. त्यातच अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गडकऱ्यांचे जिवलग मित्र त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचे ५ मे १९१८ रोजी अपघाती निधन झाले. हा आघात गडकऱ्यांना जिव्हारी लागला. त्यांची प्रकृती खालावू लागली. पुण्यातून हवापालटासाठी- प्रकृतिस्वास्थासाठी गडकरी आपले बंधू बाबुलभाई यांच्याकडे सापनेर येथे गेले आणि काही दिवसांतच २३ जाने १९१९ रोजी मध्यरात्री गडकऱ्यांची प्राणज्योत मावळली. ‘तुझ्यापुढे बोलण्याची सोयच नाही’, तुमच्याकडे सोईचे बोलणेच नाही’. अशी चमत्कृतीपूर्ण संवाद लिहिणारे गडकरी. त्यांचा जन्म २६ मे १८८५, नवसारी येथे आणि त्यांचे निधन २३ मे १९१९ सापनेर या गावी. नवसारी आणि सावनेर केवळ शब्दांची उलटापालट. विलक्षण योगायोग!
गडकरी गेले. पण ते सरस्वतीच्या गळ्यातील कंठमणी ठरले. गडकऱ्यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनापासून तो आजपर्यंत आणि पुढेही गडकऱ्यांचा पुण्यस्मरण दिवस हा महाराष्ट्राचा, मराठी साहित्याचा, मराठी संस्कृतीचा संस्मरणीय दिवस. या नाटककाराला, या कवीला, या प्रेमाच्या शाहिराला आणि बाळकरामाला मुजरा करण्यात लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वाना मनस्वी धन्यता वाटते. महाराष्ट्राचे प्रचंड पुरुष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ कवी केशवकुमार यांनी ‘मनोरंजन’ मासिकाच्या फेब्रुवारी १९१९ च्या अंकात ‘अश्रूंची ओंजळ’ ही अप्रतिम कविता लिहून गडकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रतिवर्षी आचार्य अत्रे गडकऱ्यांचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान देत. लेख लिहीत. ते त्यांचे व्रतच होते. एके ठिकाणी आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे. ‘‘गडकऱ्यांच्यावर महाराष्ट्रात मी कुठे अन् किती बोललो आहे अन् किती किती लिहिले आहे. याची आता मोजदाद करणे हे देखील कठीण आहे. त्यांच्याविषयी होते नव्हते ते सर्व सांगून झाले आहे. पण ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा मोह काही आवरत नाही. गडकऱ्यांचा आठवावा प्रताप, गडकऱ्यांचा आठवावा साक्षेप, असेच माझ्या सारख्या त्यांच्या भक्ताला वाटते.’’ (गडकरी सर्वस्व). मराठीमधील नामवंत साहित्यिकांनी, नाटककारांनी, कवींनी, समीक्षकांनी गडकऱ्यांच्या कार्याची दखल घेतलेलीच आहे. अनेकांनी स्तुतिसुमनांची उधळण केली. अनेकांनी गडकऱ्यांच्या भाषेचा, कल्पनाविलासाचा आपल्या लिखाणात नक्कल करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यांचा विनोद स्वीकारला तर काहींनी त्यांच्या लिखाणातील दोषही दाखविले. पण गडकऱ्यांची महानता त्यांच्या टीकाकारासह सर्वानाच मान्य आहे. हीच तर गडकरी वाङ्मयाची एकमेवता.
गडकरी वाचल्याशिवाय, गडकरी म्हटल्याशिवाय उमगणार नाही. ही नशा काही औरच आहे. तुम्ही रंगकर्मी असा, रंगधर्मी असा, व्यावसायिक- प्रायोगिक, समान्तर- असमान्तर व नाटय़, नवकविता कोणत्याही मार्गाचे असा पण गडकरी वाङ्मयाला पर्याय नाही. त्याचा सखोल अभ्यास, मनन, चिंतन, प्रगटीकरण झालेच पाहिजे. ते होवो! श्रीशंवंदे। तुम्हा तो सुखकर हो शंकर।

वाऱ्यावरती थिरकत गेले झाडावरूनी पिंपळपान...............
जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.

या वास्तूविषयी माहिती देताना इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, ""भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.''
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''

याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे. ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला आहे, असेही लवाटे यांनी सांगितले.

छडी लागे छमछम.....वसंत बापट

छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल

शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी

म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.....

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन.........प्रल्हाद केशव अत्रे

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न

Thursday, February 3, 2011

एखाद्याचें नशीब ...... गोविंदाग्रज

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,

काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


परीटास.........केशवकुमार

परिटा येशिल कधी परतून?


काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!
परिटा...

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
परिटा...

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
परिटा...

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
परिटा...

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!
परिटा...

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!
परिटा...

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!
परिटा...

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!
परिटा...

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!
परिटा...

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?

या नभाने या भुईला दान द्यावे ............ना. धों. महानोर

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.


इठ्ठल मंदीर....................बहिणाबाई चौधरी


माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

देव अजब गारोडी.............बहिणाबाई चौधरी


धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
व-‍हे पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे

ऊन वा-‍याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वा-‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !


Tuesday, January 25, 2011

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

हे कंकण करि बान्धियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले
मी सिध्द मरायाला हो।
बलसागर भारत होवो ।।1।।

वैभवी देश चढवीन
सर्वस्वी त्यास अर्पिन
तिमिर घोर संहारीन
या बन्धु सहाय्याला हो।
बल सागर भारत होवो ।।2।।

हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।
बलसागर भारत होवो ।।3।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।
बलसागर भारत होवो ।।4।।

या उठा करू हो सार्थ
सम्पादु दिव्य पुरूषार्थ
जीवन हे ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।
बलसागर भारत होवो ।।5।।

मी माय थोर होईल
वैभव दिव्य शोभेल
जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।
बलसागर भारत होवो ।।6।।
- साने गुरूजी

आता उठवू सारे रान.........साने गुरुजी

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

Saturday, January 22, 2011

केशवसुत .....कृष्णाजी केशव दामले

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांचा दि. ७ ऑक्टोबर १८६६ रोजी मालगुंड, जि.रत्नागिरी येथे जन्म झाला.

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.

इंग्रजीतील कवितांतून दिसणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन केशवसुतांनी प्रथम मराठीत आणला. कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी, कोणत्याही प्रभावाशिवाय असे ते म्हणत. तिने याच प्रकारचे काव्य रचावे, असेच रचावे असे तिला आपण आदेश देऊ नयेत असे त्यांचे म्हणणे होते. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला.

त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.



मालगुंड येथील केशवसुत स्मारक

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून

प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

मराठी कवितेच्या क्षेत्रात क्रांती घडवणार्‍या, कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

Thursday, January 20, 2011

कुसुमाग्रज....विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९)

विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककारसमीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.
ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.
यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
१९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली.

कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस!

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या चिंताजनक स्थितीविषयी आणि शासनाच्या अनास्थेविषयी भाष्य केले होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी मराठी भाषेविषयीचे विचार व्यक्त केले होते.
‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे; गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ या त्यांच्या काव्यपंक्तींतून त्यांचे मराठी-प्रेम दिसून येते.
कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.


Tuesday, January 18, 2011

मंथर नाग


ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

- कुसुमाग्रज

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

- कुसुमाग्रज

गवाताच पातं

गवाताच पातं वार्‍यावर डोलतं
डोलतान म्हणतं खेळायला चला ||ध्रु||

झर्‍यातलं पाणी खळ खळा हसतं
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला ||१||

झिम्मड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो
धावताना म्हणतो शिवायाला चला ||२||

मनिच पिल्लू पायाशी लोळतं
लोळतान म्हणतं जेवायला चला
अहो,जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||३||


- कुसुमाग्रज

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत

बाभळी


लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे

- कवयित्री इंदिरा संत

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.

शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणि कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
किती फीरावे... उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण ...

निवडुंगाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची ...

- इंदिरा संत

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

- ग. ह. पाटील

फुलपांखरूं

फुलपांखरूं !

छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह. पाटील

लेझिम चाले जोरात

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,

शेतकरी मन प्रसन्न जाहले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...
ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले...,
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,
छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्रीधर बाळकृष्ण रानडे

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी

खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात ध्रुर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !

- माधव ज्यूलीअन

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा, टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे, तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्या धनप्रतिष्ठा, लाभे अता मला ही,
आईविणे परी मी, हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा, की तिर्थरुप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


- माधव ज्यूलीअन

मृग


माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनीया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

-ग. दि. माडगुळकर

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !
गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


- ग.दि. माडगूळकर

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

- ग.दि. माडगुळकर

जिंकू किंवा मरू

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुऊसंगे, युद्ध आमुचे सरू

जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक, लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू


गीत - ग. दि. माडगूळकर

पोटापुरता पैसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी

देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥

हवाच तितुका पाडी पाउस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥

सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥

- ग. दि. माडगूळकर

दीवटी - वि. म. कुलकर्णी

आधी होते मी दीवटी

शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मीणमीणती!!

समई केले मला कुणी
देवापुढती नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत कालासा धूर!!

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच त्यातील प्री ज्योती !!

ब्त्तीचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बर्वे
वरात मज वाचून अडे
झ्ग्झ्गाट तो कसा पडे!!

आता झाले मी बीज्ली
घरे मंदीरे ल्ख्ल्ख्ली
देवा ठाउक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे .

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जलो अन् जग उजलो!!

-वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,


रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !

कवी - वि.म. कुलकर्णी

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी

मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

- वि. म. कुलकर्णी

अमर हुतात्मे झाले!

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !

- वि. म. कुलकर्णी

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले
दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

- बा.भ. बोरकर

चढवू गगनी निशाण

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण

कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण

- बा.भ. बोरकर

विचित्र वीणा

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते

थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

- बा. भ. बोरकर

माझा गाव - बा. भ. बोरकर

निळ्या खाडीच्या काठाला

माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !

पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.

माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.

असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.

थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.

जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.

गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.

- बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत - बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||

- बा. भ. बोरकर

तेथे कर माझे जुळती - बा. भ. बोरकर

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥
जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)

लाला टांगेवाला

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला

ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

- नारायण गोविंद शुक्ल

ऋणाईत


स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...

कवी - केशव तानाजी मेश्राम

संदिग्ध ढगांच्या ओळी - ग्रेस

पाऊस कधीचा पडतो,

झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी,
पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा,
या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

-- माणिक सी. गोडघाटे उर्फ कवी ग्रेस

भय इथले संपत नाही.....ग्रेस

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो... तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

- कवी ग्रेस

बहु असोत सुंदर .....श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर संपन्न की महा

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

आई - फ. मु. शिंदे

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मु. शिंदे

डरांव डरांव बालगीत)

आभाळ वाजलं धडामधूम

वारा सुटला सूं सूं सूं
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभर जाऊन बुडली, बुडली.
बोटीवर बसले बेडूकराव
बेडूक म्हणाला डरांव डरांव.

इंजिनदादा (बालगीत)

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या

- (अज्ञात)

संथ निळे हे पाणी .....मंगेश पाडगावकर

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदणे ओले
थिबके पाण्यावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मनाचा गाभारा

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ..... मंगेश पाडगावकर

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ........मंगेश पाडगावकर

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

खबरदार जर टाच मारुनी ...... वा.भा. पाठक

सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अती भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमावीण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"

- वा.भा. पाठक

मी फुल तृणातील इवले ......... मंगेश पाडगावकर

जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:ला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणाच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

- मंगेश पाडगावकर

Wednesday, January 12, 2011

हीच दैना ..... विंदा करंदीकर

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.

-”मृदगंध” विंदा करंदीकर

रचना ..... विंदा करंदीकर

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर