Thursday, February 3, 2011

एखाद्याचें नशीब ...... गोविंदाग्रज

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,

काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


परीटास.........केशवकुमार

परिटा येशिल कधी परतून?


काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!
परिटा...

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
परिटा...

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
परिटा...

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
परिटा...

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!
परिटा...

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!
परिटा...

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!
परिटा...

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!
परिटा...

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!
परिटा...

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?

या नभाने या भुईला दान द्यावे ............ना. धों. महानोर

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.


इठ्ठल मंदीर....................बहिणाबाई चौधरी


माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

देव अजब गारोडी.............बहिणाबाई चौधरी


धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
व-‍हे पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे

ऊन वा-‍याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वा-‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !


Tuesday, January 25, 2011

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

हे कंकण करि बान्धियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले
मी सिध्द मरायाला हो।
बलसागर भारत होवो ।।1।।

वैभवी देश चढवीन
सर्वस्वी त्यास अर्पिन
तिमिर घोर संहारीन
या बन्धु सहाय्याला हो।
बल सागर भारत होवो ।।2।।

हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।
बलसागर भारत होवो ।।3।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।
बलसागर भारत होवो ।।4।।

या उठा करू हो सार्थ
सम्पादु दिव्य पुरूषार्थ
जीवन हे ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।
बलसागर भारत होवो ।।5।।

मी माय थोर होईल
वैभव दिव्य शोभेल
जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।
बलसागर भारत होवो ।।6।।
- साने गुरूजी

आता उठवू सारे रान.........साने गुरुजी

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण