Sunday, June 30, 2024

विठ्ठल भजन..........विठू माझा लेकुरवाळा

                                                                 
विठू माझा लेकुरवाळा
सांगे गोपाळांचा मेळा

निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी

पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर

गोरा कुंभार मांडीवरी
चोख जीव बरोबरी

बंका कडेवरी
नामा करांगुली धरी

जणी म्हणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा

- पी. सावळाराम

बालगीते............शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

पोपट होता सभापती मधोमध उभा


पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो

देवाघरची लूट, देवाघरची लूट !

तुम्हा अम्हां सर्वांना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय?"


गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा."


घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन

मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"


कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."


मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,

खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."


खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."


माकड म्हणाले, "कधी वर कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."


मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.

पोहत राहिन प्रवाहात, पोहत राहिन प्रवाहात."


कांगारू म्हणाले, "माझे काय?"

"तुझे काय? हा हा हा !

शेपूट म्हणजे पाचवा पाय."


मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन

पावसाळ्यात नाच मी करीन."


पोपट म्हणाला, "छान छान !

देवाच्या देणगीचा ठेवा मान.

आपल्या शेपटाचा उपयोग करा."


"नाही तर काय होईल?"


"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

Wednesday, June 26, 2024

छोटेसे बहीणभाऊ ....... वसंत बापट

 छोटेसे बहीणभाऊ, 

उद्याला मोठाले होऊ 

उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला 

नवीन आकार देऊ 

         ओसाड उजाड जागा, 

         होतील सुंदर बागा शेतांना,

         मळ्यांना, फुलांना, फळांना 

         नवीन बहार देऊ 

मोकळ्या आभाळी जाऊ, 

मोकळ्या गळ्याने गाऊ 

निर्मळ मनाने, आनंदभराने 

आनंद देऊ अन् घेऊ 

            प्रेमाने एकत्र राहू, 

            नवीन जीवन पाहू, 

            अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे 

            अनेक एकत्र होऊ


--वसंत बापट

Tuesday, June 25, 2024

हीच अमुची प्रार्थना .... समीर सामंत (उबंटू )

                                    हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

Thursday, September 16, 2021

उभा कसा राहीला विटेवरी.. (विठ्ठल भजन)

 

विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे....

विठूराय कितीसे दूर....

इमानदारांच्या समीप अन्.....
बैमानापासून दूर....

पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||धृ.||

अंगी शोभे पितांबर पिवळा....
गळ्यामध्ये वैजयंती माळा.....
चंदनाचा टिळा माथी शोभला....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3)......||1||

चला चला पंढरीला जाऊ....
डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू....
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||2||

ठेवूनिया दोन्ही करकटी....
उभा हा मुकूंद वाळवंटी.....
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||3||

बाळ श्रावण प्रार्थी आता....
नका दूर लोटू पंढरीनाथा....
तव चरणी हा देह सारा वाहिला....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||4||

पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3)

Wednesday, November 7, 2018

गुंतता हृदय हे ...

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गीतकार : वसंत कानेटकर,
मूळ गायक : रामदास कामत,
संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी,
गीतसंग्रह/चित्रपट : संगीत मत्स्यगंधा

Tuesday, June 20, 2017

अविनाश धर्माधिकारी - चाणक्य मंडल प्रार्थना

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी,
मनी हास्य लेवुन मुक्ति जगवी,
हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

अहंता गळावी अभंगास म्हणता,
तपस्येत तल्लिन आतुन होता,
प्रतिभेस मस्तीत आकार यावे,
उरी उत्तमाचेच ओमकार गावे,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

जरी एक अश्रु पुसायास आला,
तरी जन्म काहिच कामास आला,
जरी अश्रु विस्फोट होवुन सजला,
तरी मुक्त ज्वलामुखी जन्म झाला,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

समर्थ रामदासांचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र



अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥

कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥

पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥

जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥

श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥

ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥

आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥

राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥

आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥

समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥

राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥

आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥

लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥

शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥

शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥

सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

Wednesday, December 28, 2016

अग्निपथ

वृक्ष हों भले खड़े,
हों घने हों बड़े,
एक पत्र छाँह भी,
माँग मत, माँग मत, माँग मत,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रु श्वेत रक्त से,
लथपथ लथपथ लथपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।।

Tuesday, July 10, 2012

खबरदार जर टाच मारुनी

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
सावळ्या: खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार: मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंध्ड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या: आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की -
किती ते आम्हाला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का ?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी -
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !


लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनि हळू का हसे ?
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर -
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"

Friday, January 20, 2012

कुश लव रामायण गाती


स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतील
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराज भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभुषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

Friday, September 2, 2011

इतकी नाजुक इतकी अल्लड

इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक...........३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7 

Wednesday, June 1, 2011

गोविंदाग्रज.....राम गणेश गडकरी


राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (२६ मे, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - २३ जानेवारी, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

नाटककार राम गणेश गडकरी, कवी गोविंदाग्रज आणि विनोदी लेखक बाळकराम या तीन रूपांनी रसिकजनांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे राम गणेश यांची 23 जानेवारी 2011 ही 92 वी पुण्यतिथी. तेहतीस वर्षे आणि काही महिने (जन्म २६ मे १८८५, मृत्यू २३ जाने १९१९) इतकेच अल्पायुष्य गडकऱ्यांना लाभले. पण त्यांनी वाङ्मयीन क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली!
‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।
असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार राम गणेश गडकरी! ‘आम्ही गेलो त्यावेळी स्टेजवर मुख्य पुरुषपार्टी, मुख्य स्त्री पार्टी व एक भटाचे सोंग घेतलेला मनुष्य यांची कामे चालली होती. फक्त मुख्य पार्टी नटांनीच रंग लावला होता. तो सगळ्या अंगभर होता. रंग फारच वाईट. अगदी हळदीसारखा होता. भटाने रंग लावला नव्हता. पण त्याचे सोंग हुबेहूब झाले होते. त्याची नक्कल अगदी चोख होती, पण तो फार घाईने बोलत होता. म्हणून त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते -नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी राहणाऱ्या छोटय़ा ‘जगू’ने प्रत्यक्ष लग्नसमारंभाला हजर राहून लिहिलेला रिपोर्ट- बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
गडकऱ्यांच्या वाटय़ाला सुखासमाधानाचे दिवस फारच थोडे आले. उपेक्षा आणि अपमानाचे चटके सहन करीतच त्यांना जगावे लागले. ‘एकच प्याला’ (पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ ला गंधर्व नाटक मंडळीने बडोदा येथे व बलवंत संगीत मंडळीचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी १९२० ला सोलापूर येथे), ‘भावबंधन’ (१८ ऑक्टोबर १९१९ ला बलवंत संगीत मंडळीतर्फे अकोला येथे), ‘वाग्वैजयंती’ (काव्यसंग्रह १९२१ मध्ये प्रसिद्ध झाला) या गडकऱ्यांच्या कलाकृती त्यांच्या निधनानंतर (मृत्यू-२३ जानेवारी १९१९) रसिकांच्या समोर आल्या आणि त्यानंतरच गडकरी रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले. ‘जिवंत असता लत्ता देती। मेल्यावर खांद्यावर घेती।। हे बोल गडकऱ्यांच्या बाबतीत एकशे एक टक्के खरे आहेत. चार पूर्ण (वेडय़ांचा बाजार, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन) आणि दोन अपूर्ण (राजसंन्यास, एकच प्याला- यातील पदे गडकऱ्यांचे स्नेही विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी गडकरी निधन पावल्यानंतर लिहिली आहेत.), पावणेदोनशेच्या आसपास कविता (त्यातील अनेक कविता अपूर्ण स्वरुपात) आणि रंगभूमी मासिकातले काही लेख इतकीच गडकऱ्यांची साहित्यसंपदा! पण या त्यांच्या अल्प पण उत्कृष्ट साहित्याने खरोखर काळावरही मात केलेली आहे. ‘भावबंधन’ या नाटकातला अखेरचा प्रवेश त्यांनी पांडोबा नावाच्या लेखनिकाला लिहून घ्यायला सांगितला आणि त्यानंतर मध्यरात्री गडकऱ्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
नाटकाचा नाद, गैरशिस्त अभ्यास व अस्थिर मन:स्थिती यामुळे गडकऱ्यांना परीक्षेत अपयश आले आणि त्याच वर्षी (मे १९०६) त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून, बार्शी मुक्कामी किलरेस्कर नाटक मंडळीत ‘मास्तर’ म्हणून नोकरी स्वीकारली. कंपनीतल्या मुलांना शिकवण्यापासून ते डोअरकीपपर्यंत सर्व कामे त्यांनी केली. नटवर्य गणपतराव बोडसांनी त्यांच्या नाटय़लेखनाला चालना दिली. गडकऱ्यांनी ज्यांना मनाने आधीच गुरुपदी मानले होते त्या तात्यासाहेब कोल्हटकरांची (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) प्रत्यक्ष भेट झाली. गडकऱ्यांची प्रतिभा दिसामासांनी फुलू लागली. ‘वेडय़ांचा बाजार’ हे नाटक आणि ‘रंगभूमी’ मासिकात ‘सवाई नाटकी’ या नावाने नाटय़विषयक लेख प्रसिद्ध होऊ लागले. ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘अल्लड प्रेमास’ ही कविता प्रसिद्ध झाली. ‘प्रेमसंन्यास’ या त्यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्र नाटक मंडळाने मुंबई मुक्कामी सादर केला (१७ फेबुवारी १९१२) आणि त्यानंर १ जुलै १९१६ रोजी किलरेस्कर नाटक मंडळीने त्यांचे ‘पुण्यप्रभाव’ नाटक मुंबई मुक्कामी रंगभूमीवर आणले.
‘राम गणेश गडकरी’ ‘गोविंदाग्रज’ आणि ‘बाळकराम’ या नावांभोवती आता वलय निर्माण होऊ लागले. गंधर्व मंडळीसाठी त्यांनी ‘एकच प्याला’ लिहिले, बलवंत संगीत मंडळीसाठी ‘भावबंधन’च्या लेखनास प्रारंभ केला. ‘राजसंन्यास’ चा आराखडा कागदावर मांडला, लेखनाला सुरुवात केली आणि गडकऱ्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली. त्यातच अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गडकऱ्यांचे जिवलग मित्र त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचे ५ मे १९१८ रोजी अपघाती निधन झाले. हा आघात गडकऱ्यांना जिव्हारी लागला. त्यांची प्रकृती खालावू लागली. पुण्यातून हवापालटासाठी- प्रकृतिस्वास्थासाठी गडकरी आपले बंधू बाबुलभाई यांच्याकडे सापनेर येथे गेले आणि काही दिवसांतच २३ जाने १९१९ रोजी मध्यरात्री गडकऱ्यांची प्राणज्योत मावळली. ‘तुझ्यापुढे बोलण्याची सोयच नाही’, तुमच्याकडे सोईचे बोलणेच नाही’. अशी चमत्कृतीपूर्ण संवाद लिहिणारे गडकरी. त्यांचा जन्म २६ मे १८८५, नवसारी येथे आणि त्यांचे निधन २३ मे १९१९ सापनेर या गावी. नवसारी आणि सावनेर केवळ शब्दांची उलटापालट. विलक्षण योगायोग!
गडकरी गेले. पण ते सरस्वतीच्या गळ्यातील कंठमणी ठरले. गडकऱ्यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनापासून तो आजपर्यंत आणि पुढेही गडकऱ्यांचा पुण्यस्मरण दिवस हा महाराष्ट्राचा, मराठी साहित्याचा, मराठी संस्कृतीचा संस्मरणीय दिवस. या नाटककाराला, या कवीला, या प्रेमाच्या शाहिराला आणि बाळकरामाला मुजरा करण्यात लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वाना मनस्वी धन्यता वाटते. महाराष्ट्राचे प्रचंड पुरुष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ कवी केशवकुमार यांनी ‘मनोरंजन’ मासिकाच्या फेब्रुवारी १९१९ च्या अंकात ‘अश्रूंची ओंजळ’ ही अप्रतिम कविता लिहून गडकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रतिवर्षी आचार्य अत्रे गडकऱ्यांचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान देत. लेख लिहीत. ते त्यांचे व्रतच होते. एके ठिकाणी आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे. ‘‘गडकऱ्यांच्यावर महाराष्ट्रात मी कुठे अन् किती बोललो आहे अन् किती किती लिहिले आहे. याची आता मोजदाद करणे हे देखील कठीण आहे. त्यांच्याविषयी होते नव्हते ते सर्व सांगून झाले आहे. पण ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा मोह काही आवरत नाही. गडकऱ्यांचा आठवावा प्रताप, गडकऱ्यांचा आठवावा साक्षेप, असेच माझ्या सारख्या त्यांच्या भक्ताला वाटते.’’ (गडकरी सर्वस्व). मराठीमधील नामवंत साहित्यिकांनी, नाटककारांनी, कवींनी, समीक्षकांनी गडकऱ्यांच्या कार्याची दखल घेतलेलीच आहे. अनेकांनी स्तुतिसुमनांची उधळण केली. अनेकांनी गडकऱ्यांच्या भाषेचा, कल्पनाविलासाचा आपल्या लिखाणात नक्कल करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यांचा विनोद स्वीकारला तर काहींनी त्यांच्या लिखाणातील दोषही दाखविले. पण गडकऱ्यांची महानता त्यांच्या टीकाकारासह सर्वानाच मान्य आहे. हीच तर गडकरी वाङ्मयाची एकमेवता.
गडकरी वाचल्याशिवाय, गडकरी म्हटल्याशिवाय उमगणार नाही. ही नशा काही औरच आहे. तुम्ही रंगकर्मी असा, रंगधर्मी असा, व्यावसायिक- प्रायोगिक, समान्तर- असमान्तर व नाटय़, नवकविता कोणत्याही मार्गाचे असा पण गडकरी वाङ्मयाला पर्याय नाही. त्याचा सखोल अभ्यास, मनन, चिंतन, प्रगटीकरण झालेच पाहिजे. ते होवो! श्रीशंवंदे। तुम्हा तो सुखकर हो शंकर।

वाऱ्यावरती थिरकत गेले झाडावरूनी पिंपळपान...............
जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.

या वास्तूविषयी माहिती देताना इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, ""भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.''
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''

याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे. ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला आहे, असेही लवाटे यांनी सांगितले.

छडी लागे छमछम.....वसंत बापट

छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल

शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी

म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.....

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन.........प्रल्हाद केशव अत्रे

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न

Thursday, February 3, 2011

एखाद्याचें नशीब ...... गोविंदाग्रज

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,

काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


परीटास.........केशवकुमार

परिटा येशिल कधी परतून?


काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!
परिटा...

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
परिटा...

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
परिटा...

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
परिटा...

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!
परिटा...

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!
परिटा...

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!
परिटा...

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!
परिटा...

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!
परिटा...

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?

या नभाने या भुईला दान द्यावे ............ना. धों. महानोर

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.


इठ्ठल मंदीर....................बहिणाबाई चौधरी


माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी